भारत अध्यक्ष झाल्याने तिसऱ्या जगातील देशांमध्येही विश्वासाची बीजे पेरली गेली!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 07:42 AM2023-09-04T07:42:56+5:302023-09-04T07:43:04+5:30

नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’चे मुख्य संपादक विजय जोशी आणि वरिष्ठ संपादकांना त्यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी विशेष मुलाखत दिली.

With India as President, seeds of faith were sown in third world countries too! | भारत अध्यक्ष झाल्याने तिसऱ्या जगातील देशांमध्येही विश्वासाची बीजे पेरली गेली!

भारत अध्यक्ष झाल्याने तिसऱ्या जगातील देशांमध्येही विश्वासाची बीजे पेरली गेली!

googlenewsNext

भारताच्या जी-२० अध्यक्षपदाने तिसऱ्या जगातील (थर्ड वर्ल्ड) देशांमध्येही विश्वासाची बीजे पेरली आहेत. हवामान बदल आणि जागतिक संस्थात्मक सुधारणा यांसारख्या अनेक मुद्द्यांवर येत्या काही वर्षांत जगाची दिशा ठरवण्याचा त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’चे मुख्य संपादक विजय जोशी आणि वरिष्ठ संपादकांना त्यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की,  आम्ही अधिक प्रातिनिधिक आणि सर्वसमावेशक प्रणालीकडे त्वरेने वाटचाल करू, जिथे प्रत्येक आवाज ऐकला जाईल. या मुलाखतीचा हा संपादित भाग...

जी-२० अध्यक्षपदाबद्दल काय सांगाल?
भारत जेव्हा जी-२०चा अध्यक्ष बनला तेव्हा आमचे शब्द आणि जगासाठीची दृष्टी केवळ कल्पना म्हणून घेतली जात नव्हती, तर भविष्यासाठी दिशादर्शक म्हणून घेतले जात होते. जगाला आवश्यक असलेले अनेक उपाय आपल्या देशात आधीच वेगाने आणि मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे राबवले जात आहेत. भारताच्या जी-२० अध्यक्षपदाचे अनेक सकारात्मक परिणाम समोर येत आहेत. त्यातील काही माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहेत. भारताच्या जी-२० अध्यक्षपदाने तथाकथित तिसऱ्या जगाच्या देशांमध्येही विश्वासाची बीजे पेरली आहेत. 

जी-२० चे अध्यक्षपद ब्राझीलकडे जाईल, राष्ट्राध्यक्ष सिल्वा यांना काय सल्ला द्याल?
कोणत्याही देशाला त्यांच्या जी-२० अध्यक्षपदाच्या काळात काय करावे, याबद्दल सल्ला देणे माझ्यासाठी योग्य ठरणार नाही. प्रत्येकाची स्वत:ची अशी खास ताकद असते आणि त्यानुसार ते पुढे जातात. पुढील वर्षीही आपण ‘ट्रोइका’चा (जी-२० मधील सर्वोच्च गट) भाग असून, जे आपल्या अध्यक्षपदाच्या पलीकडे जी-२० मध्ये निरंतर रचनात्मक योगदान सुनिश्चित करेल.

भारताने आफ्रिकन संघाला जी-२०चा स्थायी सदस्य बनवण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा आवाज आंतरराष्ट्रीय मंचावर ऐकला जाणे महत्त्वाचे का आहे?  
आफ्रिकेबद्दलची आमची ओढ स्वाभाविक आहे. आफ्रिकेसोबत आमचे शतकानुशतके जुने सांस्कृतिक आणि व्यावसायिक संबंध आहेत. वसाहतवादाच्या विरोधातील चळवळींचा आपला इतिहास सामाईक आहे. जी-२० मध्येही आफ्रिकेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जी-२०च्या अध्यक्षपदी असताना आम्ही केलेल्या पहिल्या गोष्टींपैकी एक म्हणजे ‘व्हॉइस ऑफ द ग्लोबल साउथ समिट’ आयोजित करणे, ज्यामध्ये आफ्रिकेतून उत्साही सहभाग होता. आमचा असा विश्वास आहे की, पृथ्वीच्या भविष्यासाठी कोणतीही योजना सर्व आवाजांचे प्रतिनिधित्व आणि त्यांच्या मान्यतेशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. निव्वळ उपयुक्ततावादी जागतिक दृष्टिकोनातून बाहेर पडून ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ सूत्र अंगीकारण्याची गरज आहे.

आता तुम्ही जैव-इंधन भागीदारीचा प्रस्ताव देत आहात. त्याचा उद्देश काय आहे?
विसाव्या शतकातील आणि २१व्या शतकातील जगामध्ये खूप फरक आहे. आपल्या भावी पिढ्यांसाठी आपल्या ग्रहाचे संरक्षण आणि जतन करणे ही एक सामाईक जबाबदारी आहे, ज्याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. आम्ही भारतात हवामान केंद्रित उपक्रमांमध्ये मोठी प्रगती करत आहोत. अवघ्या काही वर्षांत भारताने आपली सौरऊर्जा क्षमता २० पट वाढवली आहे. पवनऊर्जेच्या बाबतीत भारत जगातील पहिल्या चार देशांमध्ये आहे. इलेक्ट्रिक वाहन क्रांतीमध्ये, भारत नव्या गोष्टी आत्मसात करण्यात आणि त्याचा वापर, या दोन्हीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जी-२० देशांपैकी आम्ही कदाचित पहिले देश आहोत, ज्यांनी त्यांचे हवामान लक्ष्य निर्धारित वेळेच्या नऊ वर्षे आधी गाठले आहे.

चीनच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या श्रीलंका, सुदान आदी देशांना भारत मदत करत आहे का?  
कर्जाचे संकट खरोखरच जगासाठी, विशेषतः विकसनशील देशांसाठी चिंतेचा विषय आहे. आमच्या जी-२० अध्यक्षपदाच्या काळात कर्जाच्या गुंतागुंतीमुळे निर्माण झालेल्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जी-२० देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नर यांनी कर्ज व्यवहारात चांगली प्रगती झाल्याचे मान्य केले आहे. 

सायबर गुन्ह्यांमुळे मनी लाँड्रिंग आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईची  व्याप्ती वाढली आहे. काय सांगाल? 
सायबर धमक्या गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. त्यांच्या प्रतिकूल परिणामांचा एक भाग म्हणजे त्यांच्यामुळे होणारे आर्थिक नुकसान. जागतिक बँकेचा अंदाज आहे की, सायबर हल्ल्यांमुळे २०१९- २०२३ दरम्यान, जगाचे अंदाजे ५.२ ट्रिलियन डॉलरचे नुकसान होऊ शकते. सायबर सुरक्षेत जागतिक सहकार्य अपरिहार्य आहे. 

संयुक्त राष्ट्र संघाकडे ‘बोलण्याचे दुकान’ म्हणून पाहिले जात आहे. काय सांगाल? 
एक वैविध्यपूर्ण राष्ट्र, लोकशाहीची जननी, जगातील सर्वांत मोठ्या तरुण लोकसंख्येपैकी एक आणि जगातील विकासाचे इंजिन म्हणून भारताकडे जगाचे भविष्य घडवण्यात मोठे योगदान आहे. या प्रवासात बदललेल्या जागतिक वास्तविकता, भारताची प्रगती आणि आपल्या आंतरराष्ट्रीय संस्थांमधील सुधारणांची गरज याबद्दल जागरूकता आणि समज विकसित करण्यासाठी माध्यमे दुवा म्हणून काम करतात. 

 २०४७ मध्ये तुम्हाला भारत कुठे दिसतो?  
२०४७ पर्यंतचा काळ ही एक मोठी संधी आहे. या युगात असलेल्या भारतीयांना पुढील १००० वर्षे स्मरणात राहील अशा विकासाचा पाया घालण्याची एक अद्भुत संधी आहे. मला खात्री आहे की, नजिकच्या भविष्यात आपण पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असू. माझा विश्वास आहे की, २०४७ पर्यंत आपला देश विकसित देशांमध्ये सामील होईल. आपली अर्थव्यवस्था अधिक समावेशक आणि नावीन्यपूर्ण असेल.

अशी काही क्षेत्रे आहेत का, जेथे आपण आणखी काही करू शकलो असतो, असे तुम्हाला वाटते.
आमचे शाश्वत सुपरफूड ‘श्री अन्न’बद्दलची आमची आवड लक्षात घेऊन कृषिमंत्र्यांनी हवामान-स्मार्ट आणि शेतीसाठी डिजिटल दृष्टिकोनाच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करून बाजरी आणि इतर धान्यांवरील संशोधनासाठी एक आंतरराष्ट्रीय उपक्रमही सुरू केला. कामगारशक्तीच्या सहभागातील त्रुटी दूर करण्यासाठी आणि नेतृत्व आणि धोरणात्मक पदांवर महिलांची मोठी भूमिका सुनिश्चित करण्यासाठी मतैक्य निर्माण केले. ऊर्जामंत्र्यांनी हायड्रोजनसाठी उच्चस्तरीय तत्त्वांवर सहमती दर्शविली व जागतिक जैवइंधन आघाडीच्या स्थापनेचा पाया घातला. 

Web Title: With India as President, seeds of faith were sown in third world countries too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.